यावल येथील महसूल पथकाने पकडले अवैध पिवळी माती वाहतूक करणारे डंपर..
अवैध गौणखनिजातील ठराविक मोठे मासे राजकीय वातावरणामुळे होतात अदृश्य.

यावल दि.१७ ( सुरेश पाटील ) – येथील महसूल पथकाने गुरुवार दि.१७ रोजी यावल कडून फैजपुर कडे जाणारे अवैध पिवळी माती, गौण खनिज वाहतूक करणारे डंपर पकडून तहसील ऑफिसला जमा केले.अवैध गौण खनिज वाहतुकीत यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरणाचा मोठा प्रभाव आणि दबाव असल्याने अधिकाऱ्यांना म्हणजे महसूल आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करताना आणि कारवाई झाल्यानंतर मोठी कसरत करावी लागत आहे.
दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास यावलकडून फैजपूरकडे अवैधरित्या पिवळी माती,गौण खनिज वाहतूक करताना डंपर क्र.जीजे ०९ एक्स ८४०६ महसूल पथकाला आढळून आल्याने तसेच त्याच्याजवळ माती वाहतुकीचा परवाना नसल्याने ते डंपर यावल तहसील कार्यालयात जमा करून पंचनामा करण्यात आला पुढील दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी दिली,डंपर पकडण्याच्या कारवाईत नायब तहसीलदार संतोष विनंते, सर्कल सचिन जगताप, तलाठी भरत वानखेडे, दंडगोळे, सुयोग पाटील, वाहन चालक अरविंद बोरसे यांच्यासह तलाठी सहभागी होते.
अवैध आणि अधिकृत गौण खनिज वाहतुकीत सर्वात जास्त डंपर, ट्रॅक्टर, छोटा हत्ती इत्यादी वाहने ही राजकारणातील काही ठराविक नेते पदाधिकारी यांच्या काही कट्टर समर्थक पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहेत. गौण खनिज वाहतूक करताना परवाना किती वाजता काढतात आणि कोण कोण परवानगी काढत नाही हे सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. महसूल आणि पोलीस पथकाने अवैध गौण खनिज वाहनधारकांवर कारवाई केल्यास कारवाई करणाऱ्यांवर राजकीय सामाजिक दबाव प्रभाव कसा येतो हे सुद्धा सर्वांना नागरिकांना चांगल्या प्रकारे माहित आहे.
अशाच प्रकारे यावल तालुक्यातील एका अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी दुसऱ्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याने असे कृत्य करतात त्यांचे यावल तालुक्यातील लोकप्रतिनिधींशी मतभेद आहेत का..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासकीय अधिकाऱ्यांना शासकीय कामकाज करताना आणि राजकारणात वेगवेगळे गट तट निर्माण झालेले असल्याने अनेक अडचणी येत असल्याने लोकप्रतिनिधींनी आपल्या काही ठराविक पदाधिकारी कार्यकर्त्यांना समज देण्याची वेळ आली असल्याने त्यांनी अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांचा समन्वय कसा साधला जाईल याकडे आपले लक्ष केंद्रित करावे चर्चा तालुक्यात आहे.