कृषी विभागातर्फे खत कंपनी प्रतिनिधी, व विक्रेत्यांची जिल्हास्तरिय कार्यशाळा संपन्न..
खरीप हंगामासाठी खत वितरण सुरळीत ठेवण्याच्या सूचना विभागिय कृषी सहसंचालक यांनी दिल्या..

जळगाव – आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर आणि सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच घाऊक व किरकोळ विक्रेत्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली. छत्रपती शाहू सभागृह, जिल्हा परिषद जळगाव येथे झालेल्या या कार्यशाळेत खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबरोबरच शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक सुभाष काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खरीप हंगामासाठी आवश्यक खतसाठा, वितरण नियोजन, PoS मशीनद्वारे व्यवहार, साठा नोंदी तसेच शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्धतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना सुभाष काटकर यांनी खत वितरणात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी, तसेच शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट केले. खत साठवणूक, वितरणातील पारदर्शकता आणि वेळेवर पुरवठा या बाबींवर विशेष भर देण्यात आला. कार्यशाळेला कुरबान तडवी, पद्मनाभ म्हस्के, प्रदीप लोढाजी, कैलास मालु, राजू अण्णा, शैलेश काबरा, विकास बोरसे, अविनाश खैरनार यांच्यासह खत विक्रेते व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरीप हंगामात खत पुरवठा व्यवस्थेत सुसूत्रता आणून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा महत्त्वाची ठरली