जळगाव पोलिसांनी केला २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा नष्ट..

जळगाव : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहिम अधिक तीव्र करत जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल २३ गुन्ह्यांमधील तब्बल २,७२,४०,००० रुपये किमतीचा आणि एकूण १३६२ किलो वजनाचा सुका गांजा संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अंमली पदार्थ प्रकरणांतील जप्त मुद्देमालाचा आढावा घेण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी अंमली पदार्थ केंद्रीय मुद्देमाल कक्षात जमा असलेल्या जप्त गांज्याची तपासणी केली. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या २३ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल नाशासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. समितीने पडताळणी करून गांजा नष्ट करण्यास मंजुरी दिली.
आज दिनांक ११ मे २०२६ रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या इमारतीमागील मोकळ्या जागेत सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये ही नाश प्रक्रिया पार पडली. पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल, याची काळजी घेत खड्डा खोदून गांज्याचा नाश करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे तसेच निरीक्षक वजन-मापे राजेंद्र व्यवहारे उपस्थित होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. संजय दोरकर, पोह. संदीप पाटील, पोह. जयंत चौधरी, पोअ. अजय पाटील आणि पोअं. रविंद्र चौधरी यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.