जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार..
RE Wall दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर; १५ ऑगस्टपासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

जळगाव, दि.८ – : जळगाव बाह्यवळण रस्त्यावरील मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेवरील उड्डाणपुलांच्या पोहोच रस्त्यावरील RE Wall चे काही पॅनेल ३१ जुलै रोजी ढासळल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने बाह्यवळण मार्गावरील संपूर्ण वाहतूक शहरांतर्गत महामार्गावर वळविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) RE Wall च्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

सदर रेल्वे उड्डाणपुलाची तज्ज्ञांमार्फत पाहणी करण्यात येत असून, पोहोच रस्त्यावरील RE Wall च्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर १५ ऑगस्टपासून एका दिशेची (धुळे ते नागपूरकडे जाणारी) वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीचे कामाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, प्रकल्प कार्यालय जळगाव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, वाहतुकीतील बदलामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ( NHAI )कडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली असून, सुरक्षितता लक्षात घेऊनच वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(NHAI) जळगाव यांनी कळविले आहे.