जळगाव

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चार हजारांहून अधिक वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना : जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक भक्ती, शिस्त आणि समर्पणाचा अद्वितीय सोहळा..

जळगाव (प्रतिनिधी) : यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, समतेची आणि माणुसकीची जिवंत परंपरा आहे. विठ्ठलाच्या कृपेने गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकरी बंधू-भगिनींना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे. या सेवेसाठी विठ्ठलाने मला केवळ निमित्त बनविले, हेच माझे खरे भाग्य आहे. हजारो वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची सेवा करण्याची संधी लाभणे, हेच माझ्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे समाधान आहे,” असे भावनिक प्रतिपादनपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोप्रेमी ह.भ. प.गजानन महाराज वरसाडेकर हे होते.

जळगाव ग्रामीण व शहराने आज एका अद्वितीय आणि अविस्मरणीय भक्ती सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा मान मिळविला. आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य सोहळा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून उत्साहात पार पडला.

जी.एस. ग्राऊंडवर दुपारपासूनच हजारो वारकरी एकत्र जमले होते. नोंदणीकृत भाविकांना ओळखपत्रे, प्रवास पास, आवश्यक साहित्य तसेच संपूर्ण प्रवासाची माहिती देण्यात आली. त्यानंतर जी.एस. ग्राऊंडवरून नेहरू चौक मार्गे रेल्वे स्थानकापर्यंत निघालेल्या भव्य पालखी-दिंडीने संपूर्ण जळगाव शहर भक्तिमय झाले. टाळ, मृदंग, वीणा, अभंग, फुगड्या, रिंगण, हरिनामाचा अखंड गजर, भगव्या पताका, तुळशीमाळा आणि *”ज्ञानोबा -.तुकोबा… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…”* *माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी…* या जयघोषात हजारो वारकरी एकाच लयीत विठ्ठलनामात तल्लीन झाले होते. जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक हा संपूर्ण मार्ग जणू पंढरीच्या वारीचेच रूप धारण करून बसला होता.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः दिंडीत सहभागी होत टाळ वाजवत वारकऱ्यांसोबत अभंगांचा गजर केला. त्यानंतर रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्यात जाऊन त्यांनी वारकऱ्यांची विचारपूस केली. ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, दिव्यांग भाविक तसेच इतर वारकऱ्यांच्या सुविधा तपासून प्रत्येकाशी संवाद साधला. रेल्वे सुटेपर्यंत ते स्थानकावर उपस्थित राहून सर्व व्यवस्था स्वतः पाहत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि GPS मित्रपरिवार यांनी केले. नोंदणी, ओळखपत्रे, रेल्वेतील आसनव्यवस्था, डॉक्टरांचे पथक, प्रथमोपचार पेट्या, पिण्याचे पाणी, नाश्ता, भोजन, स्वयंसेवक, पंढरपूरमधील निवास, महाप्रसाद, दर्शन व्यवस्था आणि परतीच्या प्रवासाचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करण्यात आले.

विशेष रेल्वेतील प्रत्येक डब्यात दोन स्वयंसेवक, वैद्यकीय मदत, औषधे, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी निवास, चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.गौप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, समाधान महाराज भोजेकर, ज्ञानेश्वर महाराज व परमेश्वर महाराज पाळधीकर, पांडुरंग महाराज, अनिल महाराज, मयूर महाराज, गजानन महाराज.धरणगावकर, मंगलसिंग महाराज, लाला महाराज, विठोबा महाराज, कृष्णा महाराज या सर्वांनी पालखीची धुरा सांभाळली.

अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे माजी महापौर ललित कोल्हे उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह नगरसेवक टाळकरी माळकरी वारकरी यांच्यासह महिलांची विलक्षण अशी उपस्थिती होती. विशेष रेल्वे पंढरपूरच्या दिशेने रवाना होताच संपूर्ण रेल्वे स्थानक *”ज्ञानदेव… तुकाराम…”* या अखंड गजराने दुमदुमून गेले.

जी.एस. ग्राऊंडवरील कार्यक्रमात सर्वाधिक भावस्पर्शी क्षण तेव्हा अनुभवायला मिळाला, जेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी *स्वतः “विठू माऊली तू माऊली जगाची…”* हे विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेले गीत आपल्या कंठातून सादर केले.त्यांच्या स्वरांना हजारो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या निनादात उत्स्फूर्त साथ दिली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” या अखंड नामगजराने दुमदुमून गेला. चार हजारांहून अधिक वारकरी अक्षरशः भक्तिरसात तल्लीन झाले. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर उपस्थित प्रत्येकाला जणू विठ्ठलभक्तीचा दिव्य स्पर्श झाल्याची अनुभूती मिळाली. भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा हा अविस्मरणीय क्षण संपूर्ण सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरला.

जळगावच्या जी.एस. ग्राऊंडवरून निघालेली पालखी-दिंडी हा कार्यक्रमाचा सर्वात आकर्षक आणि भावस्पर्शी क्षण ठरला. हजारो वारकरी एकाच तालात टाळ-मृदंगाच्या गजरात नाचत होते. महिला फुगड्या खेळत होत्या, तर वारकरी रिंगण घालत अभंग म्हणत पुढे सरकत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वतः टाळ हातात घेऊन दिंडीत सहभागी होऊन *प्रतापराव पाटील व विकी पाटील गजानन महाराज वरसाडेकर यांच्या सोबत फुगडी खेळली.* यामुळे वारकऱ्यांचा उत्साह अधिकच वाढला. जी.एस. ग्राऊंड ते नेहरू चौक आणि तेथून रेल्वे स्थानकापर्यंतचा संपूर्ण मार्ग विठ्ठलनामाने दुमदुमून गेला. जळगावकरांनी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करून वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये –

प्रतापराव पाटील व GPS मित्र परिवाराचे परिवाराचे विलक्षण असे सूक्ष्म नियोजन

जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक भव्य पालखी-दिंडी.

पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वतः टाळ-मृदंगासह दिंडीत सहभागी.विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्यात डॉक्टर, प्रथमोपचार पेटी आणि स्वयंसेवक. पिण्याचे पाणी, नाश्ता, भोजन आणि चहाची संपूर्ण व्यवस्था.पंढरपूर येथे निवास, महाप्रसाद, चंद्रभागा स्नान, दर्शन व हरिकीर्तनाची व्यवस्था.स्वयंसेवक ढोल पथक कोल्हापूरकर यांच्या विशेष उपस्थिती सर्व वारकऱ्यांचा विमा काढण्यात आला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर कडे जाणाऱ्या रेल्वेला हिरवी झेंडे दाखवून वारीला निरोप दिला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे