१५ हजारांची लाच : जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा भुकरमापक ACB च्या जाळ्यात..

जळगाव | प्रतिनिधी – जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव येथील भुकरमापक जितेंद्र प्रकाश पाटील यांना प्रलंबित काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार यांच्या जळगाव शहरातील वडिलोपार्जित घराच्या कागदपत्रांमध्ये फेरफार होऊन त्यांच्या वडिलांचे नाव कमी करण्यात आले होते. त्याविरोधात जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयात अपील करण्यात आले होते. अपील मंजूर होऊन संबंधित नोंद रद्द करून तक्रारदारांच्या वडिलांचे नाव पुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ७/१२ उताऱ्यावर दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदारांनी अर्ज केला होता. मात्र, दीर्घकाळ कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान, १८ जून २०२६ रोजी तक्रारदार संबंधित कार्यालयात चौकशीसाठी गेले असता भुकरमापक जितेंद्र पाटील यांनी, “तुमचे काम साहेबांशी बोलून करून देतो,” असे सांगत साहेबांसाठी १० हजार रुपये आणि नंतर स्वतःसाठी ५ हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांनी २५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस जळगाव एसीबी चे उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे (ला.प्र.वि. नंदुरबार, कॅम्प-जळगाव), पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, तसेच कर्मचारी संगीता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि मनोज पाटील यांनी केली.