राष्ट्रवादीच्या आक्रोश मोर्चाला रावेर लोकसभा क्षेत्रातून हजारो शेतकरी धडक देणार – अतुल पाटील
यावल (प्रतिनिधी)-सध्या राज्यभरात शेतकरी व जनतेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड रोष असून केळी पीकविमा, कापसाचे पडलेले दर, शेती साहित्याची चोरी, शेत रस्ते अश्या अनेक अडचणी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला रावेर लोकसभा क्षेत्रातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते ट्रॅक्टर व बैलगाडी सह सहभागी होणार असल्याची माहिती यावल चे माजी नगराध्यक्ष तथा रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतिष अण्णा पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, अरुण पाटील, जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे नेतृत्वात 30 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सह जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा, कापसाला प्रती क्विंटल 12000रू हमीभाव मिळावा या सह शेती साहित्याची चोरी थांबवावी, पन्नी दारू बंद व्हावी व कायदा सुव्यवस्था सुरळीत व्हावी अशा मागण्या करण्यात येणार आहेत. या मोर्चात रावेर लोकसभा क्षेत्रातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते ट्रॅक्टर व बैलगाडी सह सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती यावल चे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी दिली.