बैलांचा साज घ्यायला गेलेल्या तरुणाला भरधाव ट्रकने चिरडले..
तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश
जळगाव – जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच एरंडोल-नेरी रस्त्यावर जळके येथून पवन गोपाल सूर्यवंशी व अलताफ बंन्डु तडवी हे मोटर सायकल ने वावडदा येथे पोळा सण असल्यामुळे बैलासाठी साज घेण्यासाठी गेले होते परतीचा प्रवास करत असताना लहु पाटील यांच्या शेताजवळ सकाळी ९:३०वाजता नेरीकडुन समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक एच आर ७३ – ९३१६ ने त्याना उडवलं यात मोटारसायकलवर मागे बसलेला पवन गोपाल सूर्यवंशी या तरुणांच्या अंगावरुन ट्रक चे चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक अर्शिद सत्तार खान ( चालक) वय वर्षे ५० हा व त्याचा किन्नर शब्बीर हजरत खान वय २० वर्षे घटनास्थळावरून घेऊन एरंडोलच्या दिशेने पसार झाला.
या घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला मिळाल्याने त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनशी संपर्क साधला व येथील कर्तव्यावर हजर असणारे पोलिस कर्मचारी कपिल पाटील, दत्ता ठाकरे व दिपक पाटील यांनी एरंडोल चौफुलीवर अपघात ग्रस्त ट्रक सह चालक व किन्नर यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस कर्मचारी दिपक पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते. एरंडोल या ठिकाणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले, पो.हे.कॉ. स्वप्नील पाटील याचे पथक पोहोचले व ट्रकसह आरोपींना ताब्यात घेऊन जळगाव येथे रवाना झाले. तसेच घटनास्थळी म्हसावद पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ. प्रदीप पाटील यांनी मयत तरुणाचा मृतदेह शवच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने आईवडीलांनी प्रचंड आक्रोश केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई , वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे वसंतवाडी गावात शोककळा पसरली आहे.