पहिल्याच पावसात नाला खोलीकरण मोहिमेचा प्रभाव : धरणगावातील नाले, बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांमध्ये समाधान..

जळगाव | प्रतिनिधी- संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी धरणगाव तालुक्यात लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या नाला खोलीकरण मोहिमेला पहिल्याच दमदार पावसात मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे तालुक्यातील नाले, पाझर तलाव आणि बंधारे पाण्याने भरून वाहू लागले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, आज सकाळी प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

मागील सहा ते सात महिन्यांपासून तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू होती. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तांत्रिक सर्व्हे करून नाल्यांचा नैसर्गिक उतार, जलप्रवाह आणि साठवण क्षमता लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने सुमारे ३१० किलोमीटर नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात या कामांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून जलस्रोत भरल्याने सिंचनासाठी मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या कामांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठाही वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.याशिवाय, नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्याने पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून गेल्यामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्याने धरणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला याचा लाभ होणार असल्याची भावना व्यक्त करत अनेक शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.