७,५०० हजाराची लाच : सामाजिक वनीकरण विभागाचा वनपाल नाशिक ACB च्या जाळ्यात..

चाळीसगाव – सामाजिक वनीकरण विभागातील वनपालाला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची कारवाई चाळीसगाव येथे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्यारेलाल विठ्ठल महाजन, वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चाळीसगाव, जि. जळगाव यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी मौजे तरवाडे, ता. चाळीसगाव येथील शेतात चंदन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अर्ज केला होता.
सदर अर्ज मंजूर होऊन तक्रारदारास वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रतिवर्ष १ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे तीन वर्षांसाठी एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यानंतर वृक्ष लागवडीसाठी करण्यात आलेल्या कुशल कामाच्या खर्चाचे बिल तक्रारदार यांनी सादर केले होते. तक्रारदाराच्या ५० हजार रुपयांच्या देयकाचे बिल काढून देण्यासाठी वनपाल प्यारेलाल महाजन यांनी बिलाच्या रकमेच्या १५ टक्के प्रमाणे ७,५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. पडताळणीदरम्यान दिनांक २४ जून २०२६ रोजी पंच साक्षीदारांसमक्ष लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दिनांक २४ जून २०२६ रोजी आरोपीला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक), पोलीस हवालदार विनोद चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे, पोलीस शिपाई योगेश शिंदे तसेच पोलीस निरीक्षक हेमंत नागरे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित एसीबीशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.