पाडळसे परिसरात वाघाचा धुमाकूळ :भोरटेक येथे गुरांच्या गोठ्यावर हल्ला एक म्हैस ठार..

यावल – पाडळसे परिसरात वाघाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे.15 रोजी पहाटे भोरटेक गावाजवळ एका गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून वाघाने एका म्हशीला ठार केले, त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाडळसे आणि आसपासच्या शिवारात वाघाच्या अस्तित्वाची चर्चा होती. काही ग्रामस्थांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिले असल्याचा दावाही केला होता. मात्र, आज पहाटे घडलेल्या या घटनेमुळे वाघाचा वावर निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भोरटेक येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून वाघाने म्हशीला ठार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आपल्या पशुधनाच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत. शेतात एकटे जाण्यासही नागरिक धजावत नाहीत, कारण वाघ मानवी वस्तीजवळ येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेची माहिती पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी वन विभागाला कळविल्याने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वनक्षेत्रपाल यावल पूर्व एस एम पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते

वनविभागाकडून वाघाच्या पावलांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभागाने तातडीने या वाघाला पकडून सुरक्षित स्थळी हलवावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. अन्यथा, भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत
कासवा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अरुण कोळी यांनी आमदार अमोल जावळे यांना माहिती दिली आमदार हे मुंबई विधानसभेच्या अधिवेशनासाठी असताना त्यांनी मुंबईहून वन क्षेत्रपाल स्वप्निल पटांगरे यांना वाघाला जेरबंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत