कैलास शेंडे – नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार:तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे गावाजवळील शेतात घर करुन राहणाऱ्या कुटुबीयांच्या काळजाच्या तुकड्याला बिबट्याने आपल्या जबड्यात उचलुन, जवळच्या शेतात नेऊन ठार केल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळी 5:30 वा. घडली. सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील दलेलपुर शिवारात अनिल करमसिंग तडवी मूळगाव सरदारनगर, वय 9 वर्ष याला शेताच्या मचान वरुन घरी परत येत असतांना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बालकावर अचानक हल्ला केला. दरम्यान बालकाला बिबट्याने पकडले असल्याचे दिसताच तेथील प्रत्यक्षदर्शी मुलांनी आरडा ओरड केली. दरम्यान बिबट्या बालकाला जवळ असलेल्या कापसाच्या शेतात फरफटत घेऊन गेला. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली परंतु त्या दरम्यान बालक रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडलेला होता. ऍम्ब्युलन्स वेळेवर न आल्याने कुटुंबियांनी बालकाला दुचाकीद्वारे तत्काळ उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे नेले असता, डॉक्टर संजय पटले यांनी त्यास मृत घोषीत केले. दरम्यान नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे पोलीस अधिकारी, वनविभागाचे अधिकारी तसेच सरदार नगर चे सरपंच रमेश तडवी उपस्थित राहून परिवाराचे सांत्वन केले. तसेच आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनात किरण सूर्यवंशी तेथे उपस्थित राहून कुटुंबाला लागणारी सर्वोतोपरी मदत करत होते.
दरम्यान बिबट्या व मानव संघर्ष सुरू झाला आहे. अशा वेळी नागरीकांचे जगणे देखील मुश्किल झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बिबट्याने अनेक लहान मुलांना ठार केले आहे. त्यामुळे शासनाने उपाययोजना म्हणुन बिबट्याना देखील जेरबंद केले आहे. परंतु तरी देखील बिबट्या बालकांवर हल्ला करीत आहे. शासन व प्रशासन यांना बिबट्याचा हल्ला थांबवता येत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात दोघांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.