जिल्हा पुन्हा हादरला : जळगावच्या तरुणाचा भुसावळात खून..
मारेकरी जळगावातील राजकारण्याचा मुलगा असल्याची चर्चा

जळगाव – जिल्ह्यात पुन्हा खून सध्या जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरात एका तरुणाचा खून झाल्यानंतर पुन्हा भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात एका तरुणाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. सलग दोन खुनांच्या घटनांमुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील दोन तरुण काही कारणास्तव भुसावळ शहरातील कंडारी भागात गेले होते. रात्री 10 च्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले आणि याचदरम्यान एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.ही धक्कादायक घटना कंडारीतील महादेव मंदिराजवळील एका बियर बारच्या परिसरात घडली. तरुणाला जखमी अवस्थेत तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाचे नाव जितेंद्र कोळी (वय ३५, रा. जळगाव) असे असल्याचे कळते.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, प्राथमिक चौकशीत मारेकरी हा जळगाव शहरातील एका नामांकित राजकारण्याचा मुलगा असल्याची चर्चा असून पोलिसांकडून याची खात्री करून घेतली जात आहे.सदर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. काही दिवसांत दोन खून. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.