भुसावळात गुन्हेगारांचा धुमाकूळ : भररस्त्यात तरुणावर गोळीबार..

भुसावळ – शहरात गुन्हेगारीने अक्षरशः हैदोस मांडला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सलग दोन खुनांच्या घटनांनंतर आता भरवस्तीत झालेल्या गोळीबारामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी रात्री दगडी पूल परिसरातील हनुमान मंदिराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, गोलू रायसिंग पंडित हे त्यांच्या घरासमोरील ओट्यावर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. गोळीबार होताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तातडीने पलायन केले. काही क्षणांतच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली.घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
गोळीबारामागील नेमके कारण काय, किती गोळ्या झाडण्यात आल्या, गोलू पंडित जखमी झाले आहेत का, तसेच हल्लेखोरांची ओळख काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या गोळीबारामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
शहरात सातत्याने घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरात कायद्याचा धाक निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.