घनकचरा व्यवस्थापनावर उपमहापौरांचा कडक पवित्रा; संबंधित कंपनीला नोटीस..

जळगाव : महानगरपालिका हद्दीत घनकचरा व्यवस्थापनाबाबत वारंवार सूचना करूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी अखेर कठोर भूमिका घेत संबंधित कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

उपमहापौर चौधरी यांनी यापूर्वी अनेक वेळा संबंधित कंपनी तसेच प्रशासनाला कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात कोणताही ठोस बदल दिसून आला नाही. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले.
विशेष म्हणजे, मागील आठ महिन्यांतील ही संबंधित कंपनीला देण्यात आलेली पहिली अधिकृत नोटीस असल्याचे समोर आले आहे. शहरातील कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटींमुळे नागरिकांत नाराजी वाढत असताना मनपाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “शहर स्वच्छता ही प्राथमिक जबाबदारी असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कामात सुधारणा न झाल्यास संबंधितांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येईल.”
शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर आता मनपाचे लक्ष केंद्रीत झाले असून, पुढील काही दिवसांत कंपनीच्या कामगिरीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.