Exclusive : मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी कोळी समाजाची दिशाभूल केली, कोळी समाज आक्रमक
जळगाव प्रतिनिधी | दोन महिन्यांपूर्वी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाच्या वतीने आदिवासी कोळी समाजाला सरसकट अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी 26 दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. मात्र कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या तब्बल २६ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सर्वांशी अखेर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. रमेश पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दोन महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषणाची सांगता केली होती.
”कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत प्रशासनाने सकारात्मक हालचाली केल्या असून प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. यामुळे कोळी समाजबांधवांनी आपले उपोषण मागे घ्यावे !” असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले असून उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी कोळी समाजाची दिशाभूल करत दोन महिने उलटून देखील मागण्या मान्य न केल्यामुळे जिल्ह्यातील कोळी समाज आक्रमक झाला असून यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती समाज बांधवांनी दिली आहे.
४ जानेवारी पासून पुन्हा कोळी समाजाचे आंदोलन…
आदिवासी कोळी समाजाला सरसकट अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी कोळी समाज आक्रमक झाला असून उद्या पासून पुन्हा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जो पर्यंत मागण्या मागण्या होत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती प्रा.भाऊसाहेब सोनवणे, पंकज सपकाळे, पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी, ऍड.गणेश सोनवणे, प्रविण सपकाळे, ऍड. विशाल सोनवणे, जगदीश सोनवणे, मोहन सपकाळे, संजय कोळी, अर्जुन सोनवणे,यांनी घेतलेल्या समाजाच्या बैठकीत दिली आहे.