पाडळसे गावात घाणीचे साम्राज्य : ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात..
यावल – तालुक्यातील पाडळसे गावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या अति दुर्लक्षामुळे गावातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जागोजागी साचलेला कचरा, तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे पसरलेली दुर्गंधी यामुळे गावकरी हैराण झाले आहेत.
गावातील मुख्य रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने या ढिगाऱ्यांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यापूर्वीच गटारी साफ न केल्यामुळे त्या तुंबल्या आहेत, गटारींमधील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे डासांचा मोठ्या प्रादुर्भाव वाढला असून,साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे या गंभीर समस्येबाबत तक्रारी केल्या आहेत, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. स्वच्छतेअभावी गावाचे विद्रूपीकरण होत असून, स्वच्छ वातावरणात जगण्याचा हक्क हिरावला जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
ग्रामस्थांनी तातडीने ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून गावातील स्वच्छतेचा प्रश्न सोडवावा, गटारी साफ करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली आहे. जर यावर त्वरित उपाययोजना केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.