नंदुरबार

आजीसह नातवाला ठार करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद..

 

कैलास शेंडे – नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी  

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय नातवासह ५० वर्षीय आजीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात मंगळवारी घडली. त्यानंतर जागी झालेल्या वनविभागाने लावलेल्या सापळ्यात नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झाला. मात्र, आणखी दोन बिबटे त्याच ठिकाणी फिरत असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे. तळोदा काजीपूर (ता. तळोदा) शिवारात अतुल सूर्यवंशी यांच्या शेतात भगदरी येथील कुटुंब रखवालदार म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे साखराबाई खेमा तडवी (वय ५०) या मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या.

बराच उशीर झाला मात्र आजी घराकडे परतली नसल्याचे पाहून त्यांची मुलगी व श्रावण हे साखराबाई यांच्या शोधात शेताकडे निघाले. शेताकडे येताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रावणवर हल्ला चढवला व त्याला ओढून बाजूच्या उसाच्या शेतात नेले. सोबत असलेली मुलगी जीव वाचवून धावत जाऊन गावातील लोकांना कळविले. ग्रामस्थांनी आरडाओरड केला.मुलाला बिबट्या घेऊन गेल्यानंतर पुन्हा आजी साखराबाईचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेहच आढळला. बिबट्याने साखराबाईचे मानेपासून वरचे डोके व छातीचा अर्धा भाग खाऊन नष्ट केला होता. साखराबाईवर बिबट्याने दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान हल्ला केला असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे श्रावणला वाचवण्यातही यश आले नाही. त्याच्या मानेवर व डोक्यावर बिबट्याच्या हल्ल्यात खोलवर जखमा झाल्याने रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर वनविभागाने तात्काळ हालचाली सुरु केल्या. पिंजरा लावला व रात्रभर वन विभागाचे कर्मचारी यांनी पाहारा ठेवला. अखेर पहाटे बिबटया पिंजरामध्ये जेरबंद झाला. मात्र, आणखी दोन बिबटे पिंजरा भोवती फिरत होते असे परिसरातील शेतमळ्यातील रखवाली करणारे सांगत होते. पैकी एक बिबटया जेरंबंद झाला आहे. दोन बिबट परीसरात फिरत असल्याने दहशत कायम आहे. त्यामुळे या बिबटयानाही जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वनविभागने २१ रोजी पिंजरामध्ये अडकलेल्या बिबटया सकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान घटना स्थळावरून पिंजरा उचलून अज्ञातस्थळी रवानगी केली.सदर नरभक्षक बिबट्याला नागपूर येथील गोरेवाडा प्राणी प्रकल्प येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. शेताची रखवाली करणारे तसेच शेतमजूर यांनी लहान मुलांना शेतावर घेऊन जाऊ नये तसेच स्वतःदेखील काळजी घ्यावी असे मत एल. एम. पाटील उप वनसंरक्षक तळोदा यांनी व्यक्त केले. मात्र जेवढी तत्परता अडकलेल्या बिबट्याच्या पिंजरा हलवण्यासाठी वनविभागाने दाखवली तेवढी तत्परता पिंजरा लावण्यासाठी दाखवली असती तर दोघांचा जीव गेला नसता अशी चर्चा जन्मानसात करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे