अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

जळगाव, : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसीसह आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी योजनेची माहिती देत शेतकऱ्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत घेतलेल्या कृषी पीक कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत उर्वरित कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ८७ हजार ८२६ कर्जखाती या योजनेसाठी पात्र असून, त्यापैकी ६५ हजार ३४३ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ५३ हजार ८९६ आणि राष्ट्रीयीकृत बँकांची ११ हजार ४४७ कर्जखाती आहेत
आतापर्यंत ३६ हजार ५०४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असून, २८ हजार ८३९ शेतकऱ्यांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. संबंधित शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी, सेतू सुविधा केंद्र किंवा आधार केंद्रावर जाऊन कर्जखात्याची पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी कर्जखाते आधार प्रमाणित असणे आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण नसेल, तरी ती तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कर्जखात्यातील माहितीतील त्रुटी, मयत शेतकऱ्यांच्या वारसांची प्रकरणे किंवा जमीन विक्रीनंतर निर्माण झालेल्या अडचणींचे निराकरण तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समित्यांमार्फत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जवळच्या महसूल अधिकारी, तलाठी, तहसील कार्यालय किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधून कर्जमाफीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.